उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शुक्रवारी तळेगावमध्ये

786 views

मावळातील लाडक्या बहिणींशी अजितदादा साधणार संवाद


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Sat Aug 10 2024

image..



*आमदार शेळके यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती*


वडगाव मावळ,10 ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी (16 ऑगस्ट) मावळ तालुक्यात येत आहे. या यात्रेदरम्यान अजितदादा तळेगाव दाभाडे व लोणावळा या दोन ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणार आहे.


आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पंढरीनाथ ढोरे उपस्थित होते. अजितदादांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात नाशिकमध्ये झाली आहे. त्यानंतर नगर जिल्ह्यातून ही यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. मावळ तालुक्यानंतर पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये देखील ही यात्रा जाणार आहे, असे शेळके यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्वागतासाठी मावळत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. जन सन्मान यात्रा तळेगाव दाभाडे येथे सकाळी दहा वाजता मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर येणार आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत आहे.


राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना, जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या सन्मान यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींशी देखील ते संवाद साधणार आहेत. शेती पंपांवरील वीज बिल माफी तसेच मावळातील पर्यटन, कृषी पर्यटनाला गती कशी मिळेल याबाबत अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.


मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 55 हजारांहून अधिक माता-भगिनींनी नावनोंदणी केली.या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान 80 हजार भगिनींना मिळाला पाहिजे,हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपले प्रयत्न सुरु आहेत.या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधावी,असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.


*'योजना पुढे सुरू राहण्यासाठी पुन्हा महायुती सरकार आवश्यक'*


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी महत्त्वाकांक्षी योजना महायुती सरकारने जाहीर केली असून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. योजना पुढे चालू राहावी, असे वाटत असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी महायुती सरकारलाच प्रचंड बहुमताने निवडून देणे आवश्यक आहे, असे आमदार शेळके म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये अशी योजना राबविण्याची धमक नाही. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर आली तर योजना बंद केली जाण्याचा धोका आहे,असा इशाराही शेळके यांनी दिला.